नेमबाजीची बक्षिसी
◆●नेमबाजीची बक्षिसी●◆ बालपण म्हणजे निरागस खट्याळपणा. त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची आपली सवय असते. कुणाच्या बागेतून आंबे पाडणं, शेतातल्या झाडांवर चढणं, शाळेतून सुट्टी करून नदीत पोहायला जाणं – हे सगळं जरी त्या काळी फार मोठं वाटायचं, तरी आज आठवलं की चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. मी सहावी-सातवीत असेन. उन्हाळ्याची दुपार. शाळा सुटली होती आणि आम्हा मुलांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता – आंब्याला पाड लागलाय, चला मग आंबे खाऊन येऊ. त्या काळी आंब्याचा प्रत्येक पाड आमच्या दृष्टीने खजिनाच होता. मांजरदरा शेतात भरत बाप्पूचं वावर होतं. त्या वावरात उभा असलेला "काळू-बाळू" नावाचा एक अफाट आंबा आम्हा मुलांचा आवडता होता. उंचीने मोठा, फांद्यांनी दाट आणि आंब्यांनी ओथंबलेला. आम्ही लांबूनच त्याच्याकडे बघत राहायचो. डोकं वर केलं की पिकलेले आंबे डोळ्यांना दिसायचे आणि तोंडाला पाणी सुटायचं. पण त्या आंब्याला एक मोठा अडसर होता – तीन-तीन आग्या मोहळं. मोहळाच्या माशांचा सैन्य त्या झाडाभोवती कायम घिरट्या घालायचं. साधा दगड झाडावर आदळला की माशा भुणभुण करत बाहेर पडा...