गोकुळ अष्टमी
गोकुळ अष्टमी सन १९८५ किंवा १९८६ चा काळ. दोन्हीपैकी एक नक्की आहे. गोकुळ अष्टमीचा शुभमुहूर्त. गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण. अंगणात दहीहंडी फुटतेय, गावभर गोकुळाष्टमीचा उत्साह. आणि त्याच मंगलक्षणी एका मुलाचा जन्म झाला. दिसायला थोडा सावळा, पण अंगावरचे तेज मात्र लहानपणापासूनच वेगळे. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्याचं नाव “गोकुळ” ठेवावं, असं ठरलं. घरात पणजी ‘ताई’ आणि आजी ‘बाई’ यांनीच हे नाव सुचवलं. नामकरण विधी पार पडला. गावात गाजावाजा झाला. मात्र भावकीतल्या “दादा” नावाच्या माणसाला हे नाव रुचलं नाही. कारण त्याच्या स्वतःच्या मुलाचं नाव आधीच “गोकुळ” होतं. दादाला वाटलं, “आपल्या मुलाचं नाव दुसऱ्याने कसं काय ठेवलं?” तो संतापला. रागाच्या भरात घरी आला आणि संतापून बोलू लागला- “आरे, मुलाचं नाव दगड ठेवा, धोंडा ठेवा, कचरा ठेवा, चाबूक, बंदूक, पिस्तूल काय ठेवायचं ते ठेवा; पण माझ्या मुलाचं नाव तुमच्या मुलाला ठेवायचं नाही..!” घरात क्षणभर शांतता पसरली. आजी, आई सगळ्या बुचकळ्यात पडल्या. आता काय करायचं? कोणतं नाव ठेवायचं? तेवढ्यात पणजी ताई पुढ...