प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा
◆●प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा●◆ ◆श्रीकृष्ण उबाळे मराठवाड्याच्या कोरड्या रानात जन्मलेलं एक लेकरू… लहानपणीच्या दुष्काळाच्या छायेत वाढलेलं… आयुष्याच्या सुरुवातीला खेड्यातल्या मळ्यात शेतकऱ्यांचे अश्रू पाहिलेलं… आणि ते अश्रू अक्षरांतून व्यक्त करून संपूर्ण मराठी साहित्यविश्वात घर करणारा लेखक म्हणजे भास्कर तात्याबा चंदनशिव. १२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या हासेगाव या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. मूळ नाव भास्कर देवराव यादव. पण दत्तक विधानानंतर ते झाले – भास्कर तात्याबा चंदनशिव. गावाकडच्या चुलीवर भाजलेल्या ज्वारीभाकरीसारखं साधं, खडतर आयुष्य त्यांनी जगलं. प्राथमिक शिक्षण गावात, आणि पुढं अंबाजोगाई-औरंगाबाद (संभाजीनगर) या शिक्षण प्रवासात त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. पण कितीही शिकले तरी मन त्यांचं रुतलेलं होतं ते मातीत. कारण निजामशाहीच्या काळातील मराठवाड्यातील दुष्काळ त्यांना सतत भेडसावत होता. १९६२ ते १९७२ या दशकभर त्यांनी दुष्काळाचा अभ्यास केला, त्याला जवळून पाहिलं. गावोगावी पोटापाण्यासाठी भट...