संत सोयराबाई
●◆तुकोबांचे शब्दधन ◆●
अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेलें वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनी गेले क्रोध काम ॥३॥
देही असुनी तूं विदेही ।
सदा समाधिस्थ पाही ॥४॥
पाहते पाहणें गेलें दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥
संपूर्ण शरीर, मन, आत्मा एकाच रंगात रंगून गेले. तो म्हणजे ईश्वराचा रंग. संपूर्ण अस्तित्व विठोबा श्रीरंगाच्या भक्तिरसात पूर्णपणे ओतप्रोत झाले.
"मी" आणि "तूं" असा भेदच उरला नाही. पंढरपूरच्या विठोबाला पाहताच माझं "स्वत्व" नष्ट झालं, केवळ ईश्वरच शिल्लक राहिला.
भक्त आणि भगवंत यांच्यातील भेदभाव नाहीसा झाला. तसेच इतर भेदाभेद नष्ट झाले. क्रोध, वासना, वाईट विचारही निघून गेले, मन शुद्ध झालं.
तूं (विठोबा) शरीरात असूनही देहाच्या पलीकडचा आहेस . सदैव समाधीस्थितीत, निर्विकार, परम शांतीत असलेला आहेस.
मी पाहत असताना "मी पाहते आहे" ही जाणीवही नष्ट झाली. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य एकरूप झाले, असं चोखामेळ्यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात. हा अभंग आत्मानुभवाची परमोच्च अवस्था दर्शवतो. जिथे भक्त, भगवान आणि भक्ती, माणसामाणसातील सर्व भेद नष्ट होतात. देहभाव जाऊन, क्रोध व कामना नाहीशा होतात, आणि भक्त फक्त ईश्वररूपात रंगून जातो. साक्षात भक्त ईश्वर स्वरूप प्राप्त करतो. संत चोखामेळ्यांची पत्नी हे अनुभवते आणि त्या समाधी अवस्थेचं वर्णन करते. हे भक्तीचं अत्युच्च गूढ तत्त्वज्ञान आहे.
◆श्रीकृष्ण महाराज उबाळे
◆मो.9405344642
Comments
Post a Comment